data-language="en">
संकटातूनच शिकायचे असते!
सुनील शिवराम काजारे, नालासोपारा
‘अरे वेडय़ा, तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला. त्या पिकाला तू सभोवतालच्या परिस्थितीशी कधीच संघर्ष करू दिला नाही. उन्हाचा स्पर्श होऊ दिला नाही. सोसाटय़ाच्या वा-यातच पीक उभे राहते. तेव्हाच त्याच्यात बळ येत’’ एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते. कारण, कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पिकांचे मोठे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व सांगितले, ‘‘तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल, इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल, पण माझ्या मते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. मी एक आपल्यापुढे प्रार्थना करतो की, तुम्ही फक्त वर्षभर हा निसर्ग माझ्या ताब्यात द्या, मग बघा मी शेती फुलवून घरोघरी धान्यांच्या राशी कशा घालतो ते!’’ देव हसला आणि म्हणाला, ‘‘तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतू बनवून घे व शेती कर. इतके बोलून देव अदृश्य झाला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्याचे ठरविले. सर्व प्रथम शेतात गहू पेरले, उन्हाचा भडीमार केला आणि त्या जागी पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे म्हणून त्याने पावसाचा वर्षाव केला. काळ लोटत चालला होता. त्या दरम्यान प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाटय़ाचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या पिकांना होऊ दिला नाही. आणि पुढे त्याची शेती चांगली बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे इतके पीक त्या शेतात आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की, आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच शेतक-यांना कसा त्रास होईल, ते तो वरून पाहत असतो. त्यातच पीक आता कापणीस आले आणि शेतकरी मोठय़ा आनंदाने व गर्वाने पीक कापणीसाठी शेतात गेला. पिकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्धच पडला. कारण गव्हाच्या त्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हता. पीक नुसते वरवर आलेले दिसत होते. थोडय़ावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्याची ती अवस्था पाहून परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला, ‘‘अरे वेडय़ा, तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला. त्या पिकाला तू सभोवतालच्या परिस्थितीशी कधीच संघर्ष करू दिला नाही. उन्हाचा स्पर्श होऊ दिला नाही. सोसाटय़ाच्या वा-यातच पीक उभे राहते. तेव्हाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहणार नाही. आव्हान मिळाले नाही म्हणून तुझ्या पिकांत दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही, म्हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. लक्षात ठेव, ‘‘सोन्यालासुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते, तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात, तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.’’ आता शेतक-याला हळूहळू जीवनाचे सार उमगले होते. शेवटी त्याला त्याच्या गर्विष्ठ वागणुकीचा पच्छाताप झाला. कथासार – जीवनात जर संघर्षच नसेल, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्याच्यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. येणारे संकटच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्याची प्रेरणा देत असते. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्वी व्हायचे असेल तर संकटांपासून कधीच दूर पळून चालणार नाही. संघर्ष केल्यानेच संकटे दूर होतात, त्याच्यापासून दूर पळून नाहीत! सुनील शिवराम काजारे, नालासोपारा
data-language="en">
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा